weather update Maharashtra: पुढील ३ ते ४ दिवसांत संपूर्ण राज्यातून मान्सून परतणार; काही भागांत मात्र तुरळक पावसाची शक्यता कायम.
मुंबई, दि. ११ ऑक्टोबर २०२५:
राज्यातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला अखेर सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांतून मान्सूनने अधिकृतपणे माघार घेतली असल्याची घोषणा हवामान विभागाने केली आहे. यामुळे राज्यात पावसाचा जोर कमी झाला असून, पुढील तीन ते चार दिवसांत उर्वरित महाराष्ट्रातूनही मान्सून परतण्यासाठी हवामान अनुकूल बनले आहे.
या भागांतून मान्सून परतला
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून मान्सून परतला आहे. यासोबतच, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा आणि विदर्भातील अकोला व अमरावतीच्या पश्चिम भागातूनही मान्सूनने माघार घेतली आहे. गेल्या २४ तासांत राज्याच्या बहुतांश भागांत हवामान कोरडे राहिले, केवळ नागपूर, चंद्रपूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली.
मान्सून परतला तरी पावसाची शक्यता आहे का?
उत्तरेकडून येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण कमी झाले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नाही. मात्र, मान्सूनची माघार म्हणजे पाऊस पूर्णपणे थांबला असे नाही. स्थानिक हवामानानुसार काही भागांत तुरळक सरी कोसळू शकतात.
The southwest monsoon has further withdrawn from remaining parts of Gujarat; some parts of Maharashtra; most parts of Madhya Pradesh & Uttar Pradesh and some parts of Bihar today on10th October, 2025 pic.twitter.com/KGmjzVk3zX
— India Meteorological Department (@Indiametdept) October 10, 2025
उद्या (शनिवार, ११ ऑक्टोबर) विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, भंडारा तसेच दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये स्थानिक ढगनिर्मिती झाल्यास तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची किंवा मेघगर्जनेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हलक्या पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला असून, उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.